यवतमाळ येथे बहुजन कल्याणच्या दोन वसतीगृहांचे उद्घाटन
यवतमाळ, दि.10: बहुजन कल्याण विभागाच्यावतीने यवतमाळ येथे मुली व मुलांसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे दोन वसतीगृह सुरु करण्यात आले आहे. या वसतीगृहांचे उद्घाटन केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्याहस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे झाले. प्रत्येकी 100 इतकी वसतीगृहांची विद्यार्थी संख्या आहे.
उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी यवतमाळ येथे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक मंगला मून, ओबीसी बहुजन आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर गौरे (गोबरे), ओबीसी बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रा.सविता हजारे, ओबीसी जनमोर्चा महाराष्ट्रचे उपाध्यक्ष डॉ.विलास काळे आदी उपस्थित होते. यवतमाळ येथील सत्यसाई ज्योत मंगल कार्यालय येथील वसतीगृहात उद्घाटन कार्यक्रमाचे थेट प्रसारण करण्यात आले.
या वसतीगृहांमध्ये मुलींकरीता सत्यसाई ज्योत मंगल कार्यालय, आर्णी रोड यवतमाळ व मुलांकरीता जॅाईटंस इंग्लीश मिडीयम स्कुल समोर राजीवनगर, आर्णी रोड येथील बालाजी गरुडकर यांच्या मालकीच्या इमारतीत सदर वसतीगृह सुरु करण्यात आले आहे. सदर वसतीगृह इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग, शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागासप्रवर्गातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. वसतीगृहात विद्यार्थ्यांना मोफत राहण्याची, आंथरुण, पांघरुण, गादी व भोजनभत्ता देण्यात येणार आहे.
या वसतीगृहांमुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षणाच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. या वसतीगृहांमध्ये ६३ मुली व ६३ मुले असे एकुण १२६ विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले आहे. विद्यार्थ्यांनी वसतीगृहाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक संचालक मंगला मुन यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बहुजन कल्याण निरीक्षक श्री.घोडे, गजेंद्र राऊत यांनी परिश्रम घेतले, असे विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.