निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती पुन्हा ॲक्टिवेट
पाटबंधारे विभागाला जशास तसे उत्तर देणार; प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचा निर्धार
बहुचर्चित निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती विदर्भ मराठवाडा यांच्या वतीने कापेश्वर येथे कपिलेश्वर मंदिर परिसरात ता.६ रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीला नांदेड व यवतमाळ जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी शेतमजूर महिला भगिनी उपस्थित होत्या,सुपीक व समृद्ध जमीन,जंगल बुडून ९५ गावातील दीड लाख लोकांना विस्थापित करून देशोधडी लवू पाहणाऱ्या निम्न पैनगंगा प्रकल्प होऊ देणार नसल्याचा निर्धार बुडित व बाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांनी केला असून पाटबंधारे विभागाच्या शास्त्राचे उत्तर देण्याची तयारी शेतकऱ्यांनी केली आहे.
नांदेड यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर प्रस्तावित निम्न पैनगंगा प्रकल्प चिमटा धरणाचे काम सध्या सुरू आहे, या भागातील दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला मागील २७ वर्षापासून विरोध करत रोखून धरले आहे.
या प्रकल्पाच्या विरोधात ग्रिन ट्युबिनल कोर्ट पुणे व उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल असतानाही पाटबंधारे विभाग व भूमी अभिलेख कार्यालयाने शेतीचे सर्वे व घराच्या मोजणीचे काम हाती घेतल्याने त्याविरोधात आजच्या बैठकीत परिणामाला सामोरे जावे लागेल असा धरण विरोधी समितीने खणखणीत इशारा दिला.
◼️निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील वातावरण अतिशय शांत प्रिय असून काही अधिकाऱ्यांच्या अठाहासापाई व हेकेखोर पणामुळे बुडीत क्षेत्रातील काही गावांतील वातावरण स्फोटक होत असल्याचा आरोप सुद्धा धरण विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला.‘जान देंगे जमीन नही’ हा नारा देत पुन्हा निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीने पैनगंगा प्रकल्पा विरोधात आपले आंदोलन तीव्र करण्याचा या बैठकीच्या निमित्ताने शासनाला इशारा दिला.
पाटबंधारे विभागांने प्रकल्पाचे काम सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना जशास तसे उत्तर देऊ असा इशारा धरण विरोधी संघर्ष समितीने यावेळी दिला.पाटबंधारे विभागाच्या आततायी पणामुळे निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि याला सर्वस्वी पाटबंधारे विभागाच जबाबदार राहील असेही यावेळी अनेक वक्त्यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केले. यावेळी धरण विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांसह नांदेड यवतमाळ जिल्ह्यातील असंख्य शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
◼️निम्न पैनगंगा प्रकल्पातील बुडीत आणि बाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांसह शेत मजुरांची अत्यंत महत्वपूर्ण बैठक कापेश्वर येथे आयोजित करण्यात आली आहे.या भागात होऊ घातलेल्या प्रकल्प संदर्भात शेतकऱ्यांच्या मागण्या आणि त्यांच्या भावना विचारात न घेता हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचा अट्टाहास सरकार व पाटबंधारे विभाग करत आहे. उपमुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक घेऊन अश्वस्त केल्यानंतर पुन्हा सुद्धा काम सुरू ठेवले जाते,हे एक प्रकारे या भागातील शेतकऱ्यांची चेष्टा आहे.विद्यमान सरकार व पाटबंधारे विभागाच्या कृतीमुळे नाईलाजाने या भागातील शेतकऱ्यांना कायदा हातात घेण्यासाठी प्रावर्त करत आहेत. धरणाचा वाद आता शिंगेला पोहोचला असून साम दाम दंड भेद तत्वाचा स्वीकार करून या प्रकल्पाअंतर्गत मागील काळात घडलेल्या घटनांची पुनरावृत्ती होण्याची काळजी आता पाटबंधारे विभाग व सरकारने घ्यावी. आयोजित बैठकीला नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील बुडीत आणि बाधित क्षेत्रातील शेतकरी शेतमजुरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
डॉ.सुप्रिया गावंडे,
सामाजिक कार्यकर्त्या,धरण विरोधी संघर्ष समिती,वाई बाजार,माहूर